आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता
आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।।
बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन, तारूण्य,
वार्धक्य असा प्रत्येकाचा प्रवास चालू राहतो।।।
काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे
नि निसटले क्षण हुरहुर लावून जातात।।।
अस्थिरता आणि गती जणू सर्वांना आपल्या
गर्तेत खेचत अस्वस्थ करतात।।।
मिळत नाही आपणांस हवे
होते ते हवे होते तेव्हा।।।
कर्म आणि अर्थार्जन यांचा
ताळमेळ बसत नाही बरेचदा।।।
आवड आणि निवड यांची सांगड घालण्यात
आख्खं आयुष्य वेचलं तरी कमीच पडतं।।।
पोटाची खळगी भरता भरता आपल्या शक्यतांचा
विस्तार लोप पावतो।।।
अनेक मैलाचे दगड आपल्याला आपल्या प्रवासात
उपलब्ध होतात।।।
अस्थिरतेकडून स्थैर्याकडे वाटचाल करताना विविध
आव्हाने पेलत पोलादाहून कणखर बनावे लागते।।।
असेही कधी होते की निसर्ग आपल्या मार्फत उच्चतम कार्य
लीलया पार पाडते।।।
आपल्या असाधारण क्षमतांचा परिपूर्ण विकास करणे
हे मात्र आपल्याच अखत्यारीत असते।।।
तरी नानाविध अपेक्षांचे बाळगलेले ओझे अलगदपणे
बाजूला ठेवताना हलके नि ताजेतवाने वाटू लागते।।।
जर अतिशय उंची वर उड्डाण करावयाचे तर अनावश्यक
वजन वागवायचे नसते।।।
फूल सहजपणे आत्ममग्न असते आणि
रंग आणि सुगंध यांची आसमंतात उधळण करते।।।
तितक्या सहजतेने आपण स्वेच्छेने सत् गुण जपावेत आणि
कार्य सुगंधाने सर्वांना प्रभावित करावे।।।
ओळखावे आपले ध्येय नि करावा त्याचा विस्तार
सर्वांच्या उन्नयनासाठी।।।
निस्पृहपणे करावी वाटचाल सर्व मानवजातीच्या
कल्याणासाठी।।।
No comments:
Post a Comment