करोनाचा धक्का पचवताना
अनेक गोष्टींचा मागोवा घेतला गेला।।।
गतकाळात अचानकंच डोकावता आलं।।।
जीवनाला सकारात्मकतेची जोड देता आली।।।
वेळ आणि काळ याचा ताळमेळ जुळू लागला।।।
आपणच आपल्यांच मायेच्या माणसांशी,
मित्रमैत्रीण यांच्याशी संवाद नव्याने साधला।।।
एकांत आणि एकटेपणा यांत लक्ष्मण रेषा आखता आली।।।
पं.कुमार गंधर्वांचं निर्गुणी संगीतातील
"उड जाएगा हंस अकेला" एेकत मुशाफिरी केली।।।
अभिषेकीबुवांच्या " हे सुरांनो चंद्र व्हा" या स्वरांमध्ये
नखशिखांतपणे चिंब भिजलो।।।
किशोरीताईंच्या आवाजातील "जाणे अज मी अजर"
या ज्ञानोबा माऊलींच्या शब्दामृतात न्हाऊन निघालो।।।
लताजींनीच गावं अशा "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" मध्ये
स्मिता आणि गिरीश कर्नाड यांनी जी आर्तता
होती ती जिवंतपणे उभी केली।।।
आशाताईंच्या "माझिया मना जरा थांब ना"
म्हणत स्वतःलाच थांबायची आळवणी केली।।।
मुकेश, रफी, तलत, किशोरच्या सेंटीमेंटल
गाण्यांत तल्लीन होत स्वतः ला विसरलो।।।
कधी मोत्झार्ट, बाख , केनी जी यांच्या
संगीतात आकंठ बुडालो।।।
टागोरांच्या "गीतांजली" आणि
वाॅल्ट व्हिटमनची "तृणपर्णे" यांनी
चौकटी मोडत नवीन आयामांना साद घातली।।।
कुसुमाग्रज, गुलजार, पाडगावकर आणि ग्रेस यांच्या
काव्यप्रतिभेने भारावून गेलो।।।
शांता शेळके ह्यांच्या हायकू आनंद देऊन गेल्या।।।
अमृता प्रीतम,गौरी,विद्याताई, कविताताई
यांची बंडखोरी धीर नि ताकद देऊन गेली।।।
करोनाचा धक्का पचवताना अनेक
गोष्टींचा मागोवा घेता आला।।।
भूतकाळात एक कटाक्ष टाकता आला।।।
करोनाचं निमित्त मला उन्नत नि समृद्ध करून गेलं।।।
No comments:
Post a Comment