विश्वाचे मंगलमय अस्तित्व स्विकारताना
आपल्या मनाच्या तारांचे
झंकारमय नादब्रह्म 'आल्हाद' निर्मिते सर्वत्र।।।
काही क्वचित 'आनंदी अनुभवाचे' मोजके चकचकीत पाचू
आपल्या हाती लागतात।
तर कधी अचानकच धकाधकीच्या प्रहरांमध्ये निर्मित होणारे
प्रेमळ रागलोभाचे रूसव्यांचे प्रवाळांसारखे वेड्यावाकड्या
आकाराचे परंतु रेखीव बंध हाती लागतात ।।।
आयुष्यातील अपयशाच्या अवघड चढणीची पायवाट जोखत,
आपण विचारांची लवचिकता अंगी बाणवत
कधी सर्वांचे मन जिंकतो किंवा कधी विनम्र होतो।।।
काही वेळा घडणाऱ्या चुकांची क्षमा करण्यातही धैर्य एकवटावे लागते।।।
विविध नातेसंबंधांना वेळ देत मजबूती आणण्याचा आपण
निर्धार करतो।।।
जीवनाच्या विविध प्रकारचे आव्हानात्मक
पैलू उलगडून ध्येय साध्य करण्यासाठी,
आपण मनाच्या नितळ तळाशी
एक खोल डुबकी मारत मार्ग काढतो।।।
मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जीभेवर ताबा
ठेवण्यासाठी निग्रह करावा लागतो।
यथायोग्य कृती करत आपणाला सत्याला सामोरे जावे
लागते।।।
अजस्त्र स्वतंत्र रूप असणा-या वैश्विक रचनेमुळे
निसर्गाचे उदात्त नि भव्य अस्तित्व दिसते।।।
मानवाच्या खुजेपणाची वा ब्रह्मांडाच्या विस्तारित क्षमतेची
प्रकर्षाने पारदर्शी जाणीव होते।।।
सप्तसूर्यांच्या दैदिप्यमान प्रकाश शलाकांशी
आपले नाते जुळते आणि सहस्त्ररश्मींनी उजळते।।।
आपण लीन होतो नैसर्गिक शक्तीच्या उद्गमाशी।।।
आणि जोडले जातो आपल्या विश्व-स्त्रोताशी!!!
No comments:
Post a Comment